ध्यान म्हणजे काय?
मनाला गोंधळलेल्या स्थितीतून आनंदाच्या अवस्थेकडे नेण्याचे कौशल्य म्हणजे ध्यान ! अस्वस्थतेकडून गहिऱ्या शांततेकडे ! रोजच्या कामकाजात, मनावर वेगवेगळे छाप पडून परिणाम होत असतात ; चिंता असते आणि तणाव साठत जातात .त्यामुळे आपण आनंदी होऊ शकत नाही. आपल्या अंत:स्फुरणात अडथळे येतात’.आपला आनंद हरवून जातो. यामुळे मनावर आघात होतात आणि त्यामुळे अनेक मनोवैज्ञानिक समस्या निर्माण होतात.
ध्यान हे कमी कालावधीत मन शांत करण्याचे कौशल्य आहे. १५-२० मिनिटांत, तुम्ही अगदी अतिशय गहिऱ्या विश्रांतीचा अनुभव घेऊ शकता. ध्यानाची कला आपली मानसिक सतर्कता, शारीरिक स्वास्थ्य वृद्धिंगत करते आणि भावनिक सुसंवाद सुधारते.
ध्यान ही एक अशी अवस्था आहे जिथून सर्व गोष्टींचा उगम झालेला आहे आणि जिथे सर्व काही विलीन होते. हे आंतरिक मौन आहे जिथे तुम्हाला आनंद, प्रसन्नता, शांतता जाणवते.
ज्ञानाचे तीन प्रकार
- एक म्हणजे आपल्याला आपल्या इंद्रियांद्वारे मिळणारे ज्ञान. पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला ज्ञान देतात. दृष्टीद्वारा ज्ञान मिळते, श्रवणाने, स्पर्शाने, गंधाने आणि चव घेऊन अशा पाच प्रकारे आपल्याला ज्ञान मिळते. आपण आपल्या इंद्रियांद्वारे ज्ञान प्राप्त करतो. ज्ञानेंद्रियांच्या आकलनातून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. हा ज्ञानाचा एक स्तर झाला.
- ज्ञानाचा दुसरा स्तर बुद्धीद्वारे मिळणारे ज्ञान . आपल्याला बुद्धीद्वारे मिळणारे ज्ञान इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते. आपण सूर्यास्त होताना आणि सूर्य उगवताना पाहतो पण आपल्या बुद्धीने आपल्याला कळत असते की सूर्य मावळत नाही आणि उगवतही नाही. त्यामुळे बौद्धिक ज्ञान श्रेष्ठ आहे.
- आणखी एक ज्ञान आहे जे बौद्धिक ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि ते म्हणजे अंतर्ज्ञानातून होणारे ज्ञान. तुमच्या आतून खोलवरून काहीतरी सांगितले जाते. ते काहीतरी गहिऱ्या शांततेतून येते. त्या गाहिरेपणातून सृजन होते आणि शोध लागतो. हे सर्व त्या चेतनेच्या स्तरातून येते, जी ज्ञानाची तिसरी पातळी आहे.
ध्यानामुळे या तिसऱ्या स्तरावरील अंतर्ज्ञानरुपी ज्ञानाचे दरवाजे उघडतात.
आनंदाचे तीन स्तर
जेव्हा आपली इंद्रिये त्या त्या इंद्रिय वस्तूंमध्ये गुंततात, आपले डोळे काही पाहण्यात व्यस्त असतात आणि आपले कान ऐकत असतात तेव्हा आपल्याला थोडाफार आनंद मिळतो; परंतु आपल्या इंद्रियांची आनंद घेण्याची क्षमता कमी होत जाते. हे सगळ्याच अवयवांबाबत खरे आहे – त्यांच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाला त्यांच्या स्वतःच्याच मर्यादा असतात.
आनंदाची दुसरी पातळी म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी सृजन करता आणि काहीतरी नव्याचा शोध घेता, जसे जेव्हा तुम्ही एखादी कविता लिहिता किंवा स्वयंपाक करताना एखादा नवाच पदार्थ तयार करता.
आनंदाचा तिसरा स्तर असा आहे जो कमी होतच नाही. हा आनंद इंद्रियांद्वारे लाभत नाही आणि सृजनातूनही येत नाही. ज्ञान, शांती आणि आनंद. या तिन्ही गोष्टी वेगळ्याच स्तरातून प्राप्त होत असतात. त्या जिथून येतात – त्याचा स्रोत ‘ध्यान’ आहे. ध्यान आपल्याला आनंदाच्या तिसऱ्या स्तराकडे घेऊन जाते.
ध्यानातील टप्पे
सुरुवातीला, ध्यान म्हणजे फक्त विश्रांती आणि दुसऱ्या टप्प्यात, ध्यान तुम्हाला ऊर्जा देते. तुम्हाला अधिक उत्साही वाटते. तिसऱ्या टप्प्यात, ध्यानामुळे सृजनशीलता येते. ध्यानाचा चौथा टप्पा उत्साह आणि आनंद आणतो आणि ध्यानाची पाचवी पायरी अवर्णनीय आहे. हे म्हणजे संपूर्ण विश्वाशी एकरूप होणे आहे. पाचवी पायरी गाठण्यापूर्वी तुम्ही थांबू नका. (पाचवी पायरी अवश्य गाठा !)
ध्यानाचे १० व्यावहारिक फायदे
ध्यानाचा सराव निष्ठापूर्वक केल्यास खालील फायदे मिळतात:
-
मानसिक स्पष्टता
लालसा आणि तिरस्कार यापासून मुक्त असे शांत मन लाभण्यासाठी ध्यान हा उपाय आहे. तलावाच्या पृष्ठभागावर लहरी असतील तर आपण त्याचा तळ बघू शकत नाही. त्याचप्रमाणे, जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत आपण आपल्यातलाच सुसंवाद आणि एकात्मता अनुभवू शकत नाही. ध्यान म्हणजे वर्तमान क्षण स्वीकारणे आणि प्रत्येक क्षण पूर्णपणे गहिरेपणाने जगणे.
ध्यान तुम्हाला अधिक तीक्ष्ण, आनंदी आणि अंतर्ज्ञानी बनवते. तुम्हाला अंतर्ज्ञान हवे असते. योग्य वेळी योग्य विचार तुमच्या मनात यावा असे तुम्हाला वाटत असते.
जेव्हा मन वासना, लोभ, स्वामित्व आणि अहंकार यापासून मुक्त होते. आपण जन्मताना आपले मन जसे शुद्ध स्वरुपात होते तसे शुद्ध झाले की निसर्ग आपले ऐकू लागतो आणि आपल्याला मानसिक स्पष्टता प्राप्त होते.
-
चांगले आरोग्य
आरोग्य म्हणजे काय ? निरोगी असणे म्हणजे काय ? जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत, मानसिकदृष्ट्या शांत, स्थिर आणि आतून भावनिकदृष्ट्या मृदु असते, तेव्हा ती व्यक्ती निरोगी असते. जर तुम्ही मनाने कठोर असाल ,(पुरेशी माहिती न घेता ) आपले मत बनवणारे असाल तर ते मानसिक आरोग्य नव्हे !
निरोगी असणे म्हणजे अंतर्मनापासून बाहेर तसेच बाहेरून आत हृदयाकडे सहज प्रवाह असणे. संस्कृतमध्ये स्वास्थ्य हा शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. याचा अर्थ स्वतःमध्ये स्थित असणे असा देखील होतो. स्वमध्ये स्थापित म्हणजे स्वास्थ्य होय. हे कसे साध्य करायचे ? उत्तर आहे प्राणायाम आणि ध्यान.
-
आनंद
आनंद इथे आणि या क्षणात आहे,आणि ती अनुभूती घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यान. ध्यानाने आपले मन आणि आरोग्य सुधारते आणि अधिक प्रसन्नता लाभते. पूजेचे सर्वोत्तम स्वरूप म्हणजे आनंदी राहणे. जर तुम्ही दुःखी असलात तर चंद्रही तुम्हाला चीड आणेल, मिठाई नकोशी वाटेल आणि संगीतही तुम्हाला त्रासदायक वाटेल. जेव्हा तुम्ही शांत आणि केंद्रित असता तेव्हा आतला नाद संगीतमय असतो, ढग जादुई वाटतात आणि पाऊस तर प्रेमवर्षाव असतो. म्हणून आनंदी रहा !
-
लक्ष केंद्रित होते
स्मितहास्य ,खळखळून हसणे आणि ध्यान करणे हे मानवी जीवनाचे विशेषाधिकार आहेत. एकाग्रतेमुळे ध्यान मनाला तीक्ष्ण करते आणि विश्रांतीद्वारे मनाचा विस्तार करते. जे मन, ‘न-मन’ झाले आहे, आणि आपल्या मूळ स्रोताशी परत आले आहे ते ध्यान आहे. ध्यान म्हणजे गतिमानतेतून स्थैर्याकडे, ध्वनीकडून मौनाकडे होणारा प्रवास.
-
ऊर्जेत वाढ होते
गहिरी विश्रांती आणि जोशपूर्ण काम हे एकमेकांना पूरक आहेत. जर तुम्ही तुमच्या मनाला आणि शरीराला गहिरी विश्रांती दिली नसेल तर तुम्ही उत्साहाने सक्रिय कसे राहू शकाल ? जो कधी झोपलाच नाही त्याला अजिबात उत्साह वाटणार नाही.
जेव्हा आपण अनेक कामांमध्ये गुंतलेले असतो, तेव्हा आपल्या मनावर धूळ साचते आणि आपली ऊर्जा कमी होते. मग अशावेळी स्वतःला ताजेतवाने करण्याची, ध्यान करण्याची वेळ आलेली असते. ध्यान म्हणजे आपल्या स्रोताकडे परत येणे ,जे विशाल आणि अथांग आहे.
-
तणाव कमी होतो
मनावरचा ताण म्हणजे करायचे खूप जास्त आहे आणि वेळ किंवा शक्ती खूपच कमी आहे. जेव्हा आपल्याकडे खूप काही करायचे असते, पण त्यासाठी पुरेसा वेळ आणि शक्ती नसते, तेव्हा आपल्याला ताण येतो. त्यामुळे, एकतर तुम्ही तुमच्या कामाचा भार कमी करा, ज्याची आजकाल शक्यता दिसत नाही किंवा तुम्ही तुमचा वेळ वाढवा – हे देखील शक्य नाही. तर, आपल्याकडे जे उरले आहे ते म्हणजे आपली उर्जा पातळी वाढवणे.
आता आपण आपली ऊर्जा पातळी कशी वाढवू शकतो ?
योग्य प्रमाणात अन्नाचे सेवन
खूप जास्त नाही किंवा कमीही नाही – पुरेसे कर्बोदक आणि प्रथिने असलेला संतुलित आहार.
योग्य प्रमाणात झोप
६ ते ८तासांची झोप- त्यापेक्षा जास्त नको, कमीही नको.
प्राणायाम
श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे म्हणजेच प्राणायामामुळे ऊर्जा वाढते.
तुमची उर्जा वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे
काही क्षण ध्यानस्थ स्थितीत राहणे
काही मिनिटांची गहिरी विश्रांती – जाणीवपूर्वक घेतलेली गहिरी विश्रांती, याला ध्यान म्हणता येईल. काही मिनिटांचे ध्यान सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त करते. जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी १५-२० मिनिटे ध्यान केले तर ते पुरेसे आहे. ते तुम्हाला ताजेतवाने ठेवेल.
-
सृजनशीलता बहरू लागते
तुमच्या लक्षात आले असेल जेव्हा तुम्ही बेचैन असता, गर्दी- गोंधळात असता, जेव्हा तुम्ही सतत बोलत असता, तेव्हा तुमच्याकडून काहीही काम होत नाही. काही सृजनशील कार्य करण्यासाठी तुम्हाला अशी जागा शोधावी लागेल जिथे कोणीही नाही, कोणीही तुम्हाला विचलित करणार नाही, मग तुम्ही निवांत बसता आणि कदाचित तुम्ही तुमच्या अंतर्मनाला साद घालता आणि मग त्यातून काहीतरी बाहेर येऊ लागते.
ध्यान हा आपल्या मनाच्या तळाशी जाण्याचा गहिरा अनुभव आहे. प्राणायाम आणि ध्यान तुमच्यातील सृजनशीलता उमलवण्यास मदत करतात.
-
इच्छांची पूर्ती
ध्यानामुळे आनंद घेण्याची तुमची क्षमता वाढते आणि आपल्या इच्छा सफल करण्याची तुमची क्षमता देखील वाढते. जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी काहीही नको असते, तेव्हा तुम्ही इतरांच्या इच्छा पूर्ण करू शकता.
-
अर्थपूर्ण उपस्थिती
असेही काहीतरी आहे जे गुगल तुम्हाला देऊ शकत नाही. ते म्हणजे स्पंदने. आपण आपल्या शरीरापेक्षा आपल्या स्पंदनांद्वारे अधिक संदेश देतो. पण आपली स्पंदने कशी सुधारायची हे घरी किंवा शाळेत कोणीही आपल्याला शिकवत नाही. आपल्याला अधिक सकारात्मक कसे वाटेल ? इथे ध्यानाचे महत्व कळते ! ध्यानामुळे आपल्या शरीरातील, आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीतून होणारे स्पंदन अधिकाधिक सकारात्मक होते.
-
नातेसंबंधातील आनंद वाढतो
ध्यानामुळे तुमचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होते. तुमचे इतर गोष्टी बद्दल आकलन सुधारण्यास मदत होते. तुम्ही लोकांशी कसा संवाद साधता, तुम्ही काय बोलता,तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कशी प्रतिक्रिया देता किंवा कसे वागता या गोष्टींकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देता . यामुळे तुमच्या मनात स्पष्टता येते आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांशी तुमचे नातेसंबंध अधिक चांगले होण्यास मदत होते.
व्हिडिओ: तुम्ही रोज ध्यान का करावे!
निष्कर्ष
ध्यान केल्याने तुमच्या जीवनात होणारे फायदे बघितले तर आम्हाला असे वाटते की हे सर्वाधिक समर्पक आहे आणि सध्याच्या काळात याची खूप आवश्यकता आहे. प्राचीन काळी ध्यानाचा उपयोग आत्मज्ञानासाठी, स्व चा शोध घेण्यासाठी केला जात असे.
पण ध्यान हा दुःखातून मुक्त होण्याचा, समस्यांवर मात करण्याचा देखील एक मार्ग आहे. ध्यान हा व्यक्तीच्या क्षमता वाढवण्याचा मार्ग आहे. आपण आजच्या काळातील मानसिक ताणतणावा सारख्या सामाजिक समस्या पाहिल्या की ध्यान हे अत्यंत गरजेचे आहे याची खात्री होते.
जीवनात तुमच्यावर जितकी जास्त जबाबदारी असेल, तितकी तुम्हाला ध्यानाची गरज आहे. जर तुमच्याकडे काही करण्यासारखे नसेल, तर तुम्हाला ध्यानाची इतकी गरज पडणार नाही – कारण तुम्ही काही करणारच नसता ! तुम्ही जेवढे अधिक व्यस्त असाल, तुमच्याकडे वेळ कमी असेल, तुमच्याकडे काम जास्त असेल, तुमच्या इच्छा जितक्या जास्त असतील, तुमच्या महत्त्वाकांक्षा जेवढ्या अधिक असतील – तितके तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज आहे. ध्यान केल्याने तुम्हाला चिंता आणि ताणतणावांपासून मुक्ती तर मिळतेच, त्याबरोबरच आव्हानांना तोंड देण्याची तुमची क्षमता देखील वाढते.
ध्यान केल्याने आपल्याला चांगले आरोग्य मिळते. ध्यान हे आत्म्याचे अन्न आहे. ते मनाला ऊर्जा देणारे आहे. ती शरीरासाठी जीवनरेखा आहे. ध्यान तुमचे शरीर आकारात ठेवते, तुमच्या मज्जासंस्थेला मदत करते, तुमच्या मनाला मदत करते, तुमची सजगता वाढवते, तुमचे आकलन सुधारते आणि तुम्हाला स्वतःला योग्यरित्या व्यक्त होण्यास मदत करते. अजून काय हवं? यात सर्व काही आले !
तर ध्यानाचे फायदे बरेच आहेत ! तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला जर आनंदी आणि निरोगी व्हायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे गरजेचे आहे.
सहज समाधी ध्यान योगा ने आजच तुमचा आरोग्य आणि आनंदाचा प्रवास सुरू करा !