श्री श्री रविशंकर :
तुमच्यामध्ये एक विशिष्ठ साधेपणा असतो. आपणा सर्वांनाच ती निरागसता आणि साधेपणा आपल्याला जन्मत:च मिळालेला आहे. मोठे होत असताना कुठेतरी आपण तो हरवला आहे. आपण जसे मोठे होत गेलो तसे हसायचे बंद केले, स्वाभाविक राहायचे बंद केले, साधे, सरळ राहायचे बंद केले. आपल्याला संवेदनशीलता आणि संवेदनक्षमता या दोन्हीची गरज आहे. माणसाला पूर्णपणे तर्कशुद्ध, तार्किक विचारसरणीची गरज आहे. कुणी काही म्हटले म्हणून ते लगेच स्वीकारू नका. आपली बुद्धी आपण वापरायलाच हवी. जे काही तर्काला धरून नसेल, जे तर्कात बसत नाही ते आपण स्वीकारता कामा नये.
तर सर्वप्रथम येतो तर्क. ही क्षमता महत्वाची आहे कारण त्याने संवेदनक्षमता तयार होते आणि फक्त संवेदनक्षमता उपयोगाची नाहीतर तुमच्यात संवेदनशीलताही हवी. संवेदनशीलता हे हृदयाचे काम आहे. तुम्ही अगदी तार्किक रहा, पण दुसऱ्याचा विचार काय आहे हेही तुम्हाला समजून घ्यायला हवे. ते अगदी बरोबर असतील पण त्याने समोरचा सहज दुखावला जाऊ शकतो. जो खूप रागावलेला असेल, तो त्याचा राग योग्य कसा आहे हे तर्काने दाखवून देईल पण त्याला हे समजत नाही की त्याच्या रागामुळे समोरचा दुखावला जात आहे. फक्त समोरचा माणूसच नाही तर तो स्वत:सुद्धा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संवेदनशील व्हा. एखादा माणूस मूर्ख असेल पण त्याला मूर्ख म्हणणे, त्याच्यावर ओरडणे आणि त्याला रागावणे याने काहीच होणार नाही. तुम्हाला संवेदनशील असायलाच हवे. तुम्ही एखाद्या गाढवावर बसलात आणि अपेक्षा केलीत की तो घोड्यासारखा धावेल तर ते शक्य नाही. गाढवाला गाढव म्हणून स्वीकारा आणि घोड्याला घोडा म्हणून स्वीकारा. मग राग राहिला कुठे ? हीच संवेदनशीलता आहे. दुसऱ्यांच्या भावना आणि गरजा यांच्याबद्दल संवेदनशील रहा. हा हृदयाचा गुण आहे. काही लोक अति संवेदनशील असतात. ते तर्क विसरतात. ते नुडल्ससारखे, भावनेचा गुंता झालेले असतात. हे ही चांगले नाही. तुमच्यामध्ये संवेदनशीलता आणि संवेदनक्षमता यात योग्य समतोल असायला हवा.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri